20% Discount All New Customers get register


आधुनिक मराठी कवितेच्या इतिहासात पहिला टप्पा केशवसुतांचा मानला जातो तर दुसरा टप्पा मर्ढेकर, मुक्तिबोध यांचा आणि दिलीप चित्रे, अरुण कोलटकर, विलास सारंग यांचा तिसरा टप्पा मानला जातो. या तीनही टप्प्यांवर कवितेने जी नवनवीन वळणे घेतली त्यावर आजपर्यंत मराठी साहित्यविश्वाात सातत्याने चिकित्सा होत आली आहे. त्यापुढील नव्वदोत्तर कालखंडात संपूर्ण जगभर जागतिकीकरणामुळे जे आमूलाग्र बदल झाले त्याचा साहित्यावरही फार मोठा परिणाम झाला. या नव्वदोत्तर कालखंडात मानवी जगण्यावर झालेल्या विविधांगी बदलांचा अंतर्बाह्य वेध घेणाऱ्या नव्या उत्तर-आधुनिक कवितेची मात्र पद्धतशीर चिकित्सा आजपर्यंत झालेली नव्हती, ती प्रथमच या ग्रंथातून सैद्धान्तिक स्तरावर होत आहे, हे या ग्रंथाचे आगळेपण आहे. जागतिकीकरणोत्तर कालखंडातील उत्तर- आधुनिक टप्पा हा अत्यंत अभूतपूर्व, प्रचंड गुंतागुंतीचा, व्यामिश्र स्वरूपाचा, खरे तर चक्रावून टाकणारा असा आहे. अशा या आव्हानात्मक उत्तर-आधुनिक काळाला नव्वदोत्तर कालखंडातील कवी आपल्या कवितेतून आशय आणि अभिव्यक्तीच्या अंगाने कसे भिडतात याचे पद्धतशीर विश्लेषण करून या काळातल्या कवितेचा नेमका अन्वयार्थ मीनाक्षी पाटील यांनी या ग्रंथात लावला आहे. उत्तर-आधुनिकता या संकल्पनेची सविस्तर सैद्धांतिक मांडणी करणारा आणि उत्तर-आधुनिकता आणि नव्वदोत्तर कविता यांच्यातील अन्वयार्थ उलगडणारा, सुगम, पण मौलिक परामर्श घेणारा हा मराठी समीक्षेच्या क्षेत्रातील अतिशय महत्त्वाचा ग्रंथ आहे.