20% Discount All New Customers get register


ज्या पाश्चात्य संस्कृतीची हेटाळणी करण्यात आपण धन्यता मानतो, व्यक्तीव्यक्तीमधल्या तिथल्या संबंधांविषयी उपहासानंच बोलतो, त्या संस्कृतीतली सामाजिक नीतीमूल्यं मात्र कणखर असतात. त्यामुळेच समाजातल्या प्रत्येक घटकाचं स्वातंत्र्य, त्याचे हक्क, याविषयीची जागरुकता कोणावरही अन्याय होऊ नये याची दक्षता घेत राहते आणि असा न्याय करताना त्या घटकाची मातृभाषा, धर्म, आर्थिक परिस्थिती यांचा अजिबात विचार होत नाही. त्यांचं अवडंबर माजवलं जात नाही. किंबहुना, न्याय-अन्यायाची मूलभूत वैचारिक बैठकच तिथं वेगळी असते. मानवी हक्काची पायमल्ली होणार नाही याची जितकी दक्षता घेतली जाते तितकीच त्याचा अतिरेक होणार नाही याचीही; पण त्यातून काही विपरीत नियमही रूढ केले जातात. आई-वडील आणि मूल यांच्या नातेसंबंधातील भावविश्वाचं स्थान नगण्य मानून त्यांच्यातील प्रत्येकाच्या मूलभूत हक्काचंच प्रस्थ काही वेळा माजवलं जातं; पण त्यापोटी कोणावर अन्याय होत असेल, तर त्याविरुद्ध आवाज उठवण्यासाठीही तिथलीच मंडळी तत्परतेनं धाव घेताना दिसतात.