20% Discount All New Customers get register


अधूनमधून मराठी रंगभूमीवर असे एखादे नाटक येते की, ते पाहिल्यावर मराठी रंगभूमी फार पुढे गेली आहे असे वाटते. अशा नाटकाचा विषय जगावेगळा तर असतोच पण त्यात आपल्या भोवतालच्या परिस्थितीचे वारे वाहताना दिसतात. त्याचे तंत्र नवतेने नटलेले असते, त्यातील पात्रे आणि घटना मन चक्रावून सोडतात. असे नाटक आपल्याला पूर्णतः हलवून सोडते. शफाअत खान यांचे ‘शोभायात्रा’ हे अशाप्रकारचे नाटक आहे. ‘शोभायात्रा’मध्ये आजकालच्या वास्तवाचा एक विस्तारित ध्वनी सतत निघत असतो. नाटक १९९९ सालात लिहिलेले असले तरीही थोड्याफार फरकाने ते आजही ताजे, आजच्या काळाचेच वाटते. अगदी आज घटकेला आपल्या देशात काय चालले आहे, राजकारण कशाविषयी चालले आहे, वेगवेगळ्या प्रकारचे संघर्ष कसे चालले आहेत, त्या सर्वांचे प्रतिबिंब ‘शोभायात्रा’मधल्या घटनांमध्ये पडलेले दिसते. मराठीतले एक गुणवान राजकीय नाटक म्हणून ‘शोभायात्रा’ नाटकाचा उल्लेख करावा लागेल.