

नारायण सुर्वे यांच्या कवितेमुळे मराठी कविता पुन्हा वास्तव जीवनाकडे, सामान्य माणसांच्या सुखदुःखांकडे वळली. कष्टकऱ्यांचे जीवन, त्यांची स्वप्ने व संघर्ष त्यांनी प्रभावीपणे मांडले. सूक्ष्म अनुभवांपुरती मर्यादित कविता त्यांनी दणकट वास्तवाने समृद्ध केली. वैफल्याच्या काळातही त्यांनी आशावादी कविता लिहून आपले वेगळेपण सिद्ध केले. संकेतांच्या जाचातून मराठी कवितेला मुक्त करून तिला नवसंजीवनी देणे हे सुर्वे यांच्या कवितेचे मोठे श्रेय आहे.