20% Discount All New Customers get register


ज्ञानपीठ पुरस्कारानंतर दिल्ली येथे झालेल्या सत्कार समारंभात केलेल्या भाषणात कुसुमाग्रजांनी आपल्या कवितेविषयी काढलेले उद्गार त्यांच्या समग्र कवितेला लागू पडतात. आयुष्यभर कवितेने जी सोबत दिली त्याविषयी बोलताना कुसुमाग्रज म्हणतात, “साठ वर्षांपूर्वी सुरू झालेली माझी शब्दयात्रा आयुष्याच्या संध्याकाळीही चालू आहे. कवितेने मला साथसोबत दिली याचा मला अभिमान व दिलासा वाटतो. कविता माझ्याबरोबर चालत राहिली असं नाही, तर सभोवारच्या घटनांतील अर्थ आणि सातवा शोधण्याचा तिनं प्रयत्न केला व माझ्या जगण्याला माझ्यापुरता विशेष अर्थही दिला. थेंबाचा समुद्राशी आणि ठिणगीचा वणव्याशी आप्त संबंध असतो हे कवितेनं मला शिकवलं. सौंदर्य, स्वातंत्र्य व प्रेम ही मानवी जीवनाची आधारभूत तत्त्वं आहेत आणि म्हणूनच अन्याय, अत्याचार, दास्य ही जीवन विद्रूप आणि जखमी करणारी अनिष्टं आहेत ही जाणीव तिनंच मला दिली.”
मराठी काव्यरसिकांनाही कुसुमाग्रजांच्या कवितेने पाऊणशे वर्षांहून अधिक काळ साथ दिली आहे, जीवनाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर आनंद दिला आहे, जगण्याची उमेद दिली आहे आणि वास्तवाची जाणीवही करून दिली आहे. आजही ताजी, टवटवीत असलेली कुसुमाग्रजांची कविता नवीन पिढीलाही आपलीशी वाटते हेच त्या कवितेचं मोठेपण आहे.