Home

Description

प्रफुल्ल शिलेदारांची कविता तिच्यात असलेल्या विलक्षण भाषिक पारदर्शीपणामुळे प्रथमदर्शनी अतिशय साधी वाटते. या संग्रहात कवी हरवलेल्या वस्तूचे एक मिथक निर्माण करतो आणि त्यांतून तो माणसाचे अव्याहतपणे सुरू असलेले वस्तुकरण आणि अनेक प्रकारचे हरवलेपण दाखवण्याचा प्रयत्न करतो. आधुनिक जगण्याला, संवेदनशीलतेला भिडण्याची क्षमता असलेले हे मिथक वेगवेगळ्या विषयसूत्रांशी संबंधित अशा कवितांमधून, वेगवेगळ्या लयी आणि वेगवेगळी संभाषिते यांमधून आकारास येते. या संग्रहातील काही कविता व्यक्तींवर केंद्रित आहेत. दृष्यकलेबाबतचे अनेक संदर्भ कवितांमधून येतात. काही भाषालक्ष्यी कविता आहेत. काही कविता प्रेमानुभव व्यक्त करणाऱ्या वा परदेशातील अनुभवांचा आविष्कार करणाऱ्याही आहेत. वेगवेगळी स्थळे, वास्तू, नद्या, सांस्कृतिक-साहित्यिक वारसा व इतिहास कवेत घेत कवीची दृष्टी कशी सूक्ष्म आणि व्यापक होत गेलेली आहे याचा प्रत्यय आपल्याला येथे येतो. नवलाईने टिपलेले वैविध्यपूर्ण महानगर, त्याला वेढणारा समुद्र, त्यातील ऋतू येथे दिसतात. वेगवेगळ्या धर्मांसह, विधींसह, कर्मकांडांसह या महानगराचे, त्यामधील ऐतिहासिक इमारतींचे, वेगवेगळ्या जातिजमातींनी, संस्कृतींनी, ताण्याबाण्यांनी उभारलेले, जगण्यातील सूक्ष्म सत्तासंबंधांच्या मुळापर्यंत जाणारे, अद्भुत व विलक्षण असे मिथक कवी आपल्या कवितेतून निर्माण करतो. अवघ्या सृष्टीकडे आणि समग्र जगण्याकडे कवी कसा सजगपणे, जिवंतपणे पाहतो आणि आपली मुळे विस्तारत आपल्या कवितेला कसा समृद्ध, संपन्न करतो ते या कवितेत स्पष्ट होते. — वसंत पाटणकर

related this items

Product Reviews

No reviews available for this product.

VIDYA BOOKS