

स्वतःचा निर्मळ अंतःस्वर जपत संथगतीने कविता लिहिणारे प्रफुल्ल शिलेदार आजच्या मराठी कवितेतील एक महत्त्वाचे कवी आहेत. त्यांच्या कवितेचा ‘स्व’पासून समष्टीकडे होणार प्रवास त्यांच्या सर्वच कवितांमधून अधोरेखित होत जातो. जगण्याविषयी प्रचंड कुतूहल असणारी ही कविता मानवी जगण्याचा तळ शोधण्याची आकांक्षा बाळगते. त्यांच्या बहुपेडी आशयसूत्रांना अर्थाचे बहुविध स्तर प्रसविण्याकरिता आवश्यक असे अनोखे आविष्कारतंत्र त्यांच्या कवितेला सर्वच रूढ समकालीन कवितेपासून अलिप्त ठेवून स्वतंत्र वाट चोखाळायला लावते. ही कविता आवाजी नाही आणि आत्ममग्नही नाही. ही कविता वाचणाऱ्याच्या मेंदूचा संथपणे कब्जा घेऊन मानवी अस्तित्वाच्या साऱ्या शक्यता पुन्हा पुन्हा तपासून घेण्यास भाग पाडते. जगण्याचे अनंत प्रश्न केंद्रस्थानी आणून झालेल्या गुंतवळीचा स्वशोध स्वतंत्रपणे घेण्यास वाचकाला बळ पुरवते. ही कविता स्वशोधाची, समूहशोधाची आणि पर्यायाने माणसाच्या शोधाची कविता आहे.