

लेखकांनी आपल्या निरीक्षणातून आणि प्रतिभेतून कंगालांच्या दैनंदिन जीवन संघर्षातल्या हिंसेचा आणि हिंस्त्र स्वार्थाचा वेध घेतला. मानवाच्या पाशवीकरणाच्या अत्यंत गतिमान चित्रमयी शैलीतल्या कहाण्या हे बाबुरावांच्या कथांचे वैशिष्ट्य. यथार्थ चित्रणाचे असामान्य नमुने त्यात आढळतात. मनोरंजन हा बाबुरावांच्या लेखनाचा कधीच उद्देश नव्हता आणि निव्वळ रचनेच्या खेळात रमणार्या आकृतिवादाचेही त्यांना आकर्षण नव्हते. बाबुरावांनी आंबेडकरी विचारांशी बांधिलकी कधीच सोडली नाही तर कलात्मक परिप्रेक्ष्य म्हणून तिचा प्रगल्भ आणि सजाण स्पर्श निरंतर टिकवला. गावातल्या मुरळ्या, शहरातल्या सर्वांत खालच्या थरातल्या वेश्या, बेकार माणसे, बेवारशी माणसे, मनुष्यपणाच्या पातळीखालचे जीवन जगताना अपरिहार्यपणे पाशवी बनलेली माणसे हे बाबुरावांच्या कथावाड्म्यातले मानवतेचे दर्शन.